सोलापूर जिल्ह्यातील रोहन मुंबईत नोकरीला आहे. महिन्या दोन महिन्यात तो गावी जातो. मात्र, रेल्वेचं तिकीट बुक करताना तिकीट मिळेल की नाही याची धाकधुक त्याला नेहमीच सतावत राहते.
कन्फर्म तिकीट न मिळाल्यानंतर त्याच्या डोक्यात एक प्रश्न वारंवार डोकावत असतो.
पंतप्रताधन दर चार ते सहा महिन्याला नवीन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतात.तरीही त्याला गावी जाण्यासाठी तिकीट का मिळत नाही ? एवढ्या रेल्वे जातात कुठं ?
कन्फर्म तिकीट मिळावं यासाठी तो वंदेभारत आणि इतर सुपर फास्ट रेल्वेत जागा मिळेल का हे पाहतो .
सीट तर रिकाम्या असतात मात्र, दर एवढे असतात की ते खिशाला परवडत नाहीत.
मग काय ,रोहन आपली बॅग घेऊन जनरल डब्यात घुसतो.
रोहनसारखे कोट्यवधी लोकांना रेल्वेच्या प्रवासावरच निर्भर आहेत.
बहुतांश लोकांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच असल्यानं महागडं तिकीट परवडत नाही.
मुंबई ते सोलापूरपर्यंत वंदे भारतचं सीसी म्हणजेच चेअर कार साठी 1300 रुपये एवढे तिकीट आहे. तर एक्झिक्युटिव्ह चेअर म्हणजेच ईसीसाठी 2365 रुपयांचं तिकीट आहे.एलटीटीहून सुटणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसच्या थ्री टायर एसीसाठी 1170 रुपये तर टू टायर एसीसाठी 1625 रुपये लागतात. दुरांतोचे डायनामिक चार्ज आहेत. तर सुपर फास्ट आणि इतर एक्सप्रेसमध्ये थ्री टायरला 790 ते 1100 रुपये आणि टू टायरसाठी 1100 ते 1490 रुपये एवढ्ं तिकीट आहे.
येत्या एक फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी बजेट सादर होत आहे. मे महिन्यात निवडणुकाचा धुराळा उडाल्यानंतर नवीन सरकार स्थापन होणार आहे.
त्यामुळे रोहनसारख्या सामान्य प्रवाशांच्या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
वंदे भारत आणि दुरांतोसारख्या प्रीमियम रेल्वेचे तिकीट दर कमी करावेत अशी रोहनची बजेटकडून अपेक्षा आहे. या आलिशान रेल्वेचे तिकीट कमी झाल्यास सामान्य प्रवाशांनाही प्रवासाचा आनंद घेता येईल.
तिकीट कमी करणं शक्य नसतील तर किमान प्रवाशी संख्या जास्त असलेल्या मार्गावर सुपरफास्ट रेल्वेत स्लिपर क्लास डब्यांची संख्या वाढवावी. त्यामुळे आठवड्याच्या शेवटा आणि सणासुदीला सामान्य लोकांचा प्रवास सुखकर होईल.
रोहनसारख्या सामान्य प्रवाशी रेल्वेत मिळणाऱ्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंबद्दलही तक्रार आहे.
एका वर्षापूर्वी भूमिका नावाच्या महिला प्रवाशानं IRCT च्या विरोधात ट्विट करत तक्रार केली. तिकीटांचे दर तर दिवसेंदिवस वाढतच आहेत त्यातुलनेत खाद्यपदार्थचा दर्जा का चांगला होत नाही,असा सवाल तिने विचारला.
सोशल मीडियावर तर अशा हजारो तक्रारी दररोजच येतात.
तिकीटांचे दर वाढवलेत तर मग त्याप्रमाणं चांगल्या खाद्यपदार्थाची सुविधा रेल्वेनं द्यावी,अशी अपेक्षा रोहनची बजेटकडून आहे.
रोहनच्या वृद्ध पालकांनाही बजेटमधून एक गॅरंटी हवी आहे. वरिष्ठ नागरिकांना तिकीटाच्या दरात पुन्हा सवलत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलीय.
कोरोनापूर्वी 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या पुरूषाला रेल्वेच्या तिकीट दरात 40 टक्के तर 58 वर्ष वयावरील महिला प्रवाशाला पन्नास टक्के तिकीट दरात सवलत मिळत होती. कोरोना आल्यानंतर ही सवलत रद्द करण्यात आली.
वरिष्ठ नागरिकांची सवलत रद्द करून रेल्वेनं 2,242 कोटी रुपयांचं उत्पन्न कमावलंय.
2022-23 या आर्थिक वर्षात वरिष्ठ नागरिकांकडून रेल्वेला एकूण 5,062 कोटी रुपयांचं महसूल म्हणजे उत्पन्न मिळालंय.
वरिष्ठ नागरिकांची सवलत रद्द केल्यानं 2,242 कोटी रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न रेल्वेला प्राप्त झालंय.
रोहन त्याच्या आई-वडिलांप्रमाणेच इतर वरिष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकीट दरातील सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी अशी हमी मागतोय.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App