आरबीआयकडून सामान्य नागरिकांना दिलासा, रेपो दर स्थिर,कर्जाचा हप्ता वाढणार नाही
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयनं सतत सातव्यांदा रेपो दर जैसे थे ठेवलेत. आरबीआयनं रेपो दर 6.5 टक्के स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पतधोरणविषयक समितीच्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत माहिती दिली. समितीतील पाचही सदस्यांचं रेपो दर स्थिर ठेवण्याचं एकमत झालं होतं. आरबीआयनं रेपो दर स्थिर ठेवल्यानं गृहकर्जाचा आणि वाहनकर्जाचा हप्त्यात वाढ होणार नाही.
8 फेब्रुवारी 2023 नंतर आरबीआयनं एकदाही रेपो दरात वाढ केली नाही. त्यावेळी रे्पो दरात 25 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढ करून रेपो दर 6.5 टक्के केला होता. तेंव्हापासून सतत सहा वेळी पतधोरण विषयक समितीच्या बैठकीनंतर रेपो दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. रेपो दरासोबतच रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. MSF रेट आणि बँक रेट 6.75 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. तर SDF रेट 6.25 टक्के कायम आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसत असल्याचं मत गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलंय. याशिवाय खाद्य पदार्थांच्या किमतीमुळे महागाई वाढत आहे. महागाईचा दर चार टक्यांपेक्षा खाली आणण्याचं उद्दिष्ट पतधोरणविषयक समितीचं आहे. 2024 या आर्थिक वर्षात महागाईचा दर 5.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 2024 मध्ये महागाईचा दर कमी होऊ शकतो असा आशावाद आरबीआय गव्हरर्नरनं व्यक्त केला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनचा वेग म्हणजेच जीडीपीचा वेग सात टक्के राहण्याचा अंदाज आहे.
रेपो दर म्हणजे काय ?
भारतीय रिझर्व्ह बँक ज्या व्याज दरानं व्यावसायिक बँकांना कर्ज देते त्याला रेपो दर असे म्हणतात. आरबीआय महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याज दरात वाढवते किंवा कमी करतो. रेपो दरात वाढ झाल्यास कर्जाचा हप्ता वाढतो.
Published: February 8, 2024, 12:20 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App